विद्यार्थ्यांमध्ये कायम संशोधन वृत्ती असावी – ना. सुधीर मुनगंटीवार 

विद्यार्थ्यांमध्ये कायम संशोधन वृत्ती असावी – ना. सुधीर मुनगंटीवार 

बामणी (ता. बल्लारपूर) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 01 डिसेंबर : आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुसंधानचे आहे. आजही विद्यार्थ्यांमधील न्यूटन जागा होणे आवश्यक आहे. एखाद्या घटनेचे विश्लेषण करून त्यामागचे शास्त्रीय कारण शोधण्याची प्रवृत्ती वाढली तरच विद्यार्थ्यांचा प्रवास भविष्यात संशोधक म्हणून होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती कायम जागृत असली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

          बामणी (ता. बल्लारपूर) येथील सेंट पॉल हायस्कूल येथे आयोजित 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,उपविभागीय अधिकारी स्नेहल राहाटे, बल्लारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप, गटविकास अधिकारी अनिरुध्द वाळके,संस्थेचे अध्यक्ष अविनाश खैरे, निना खैरे, गटशिक्षणाधिकारी शरद बोरीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मेनका भंडूला, काशिनाथ सिंह आदी उपस्थित होते.

          शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांच्या डोक्यात येणा-या नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे, हा या प्रदर्शनीच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या डोक्यात अभ्यासक्रमासोबतच प्रश्नांची निर्मिती कायम होत राहिली पाहिजे. विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी व्हावा. विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आयुष्यात निर्भय व्हावे. त्यासाठी अभ्यास व मेहनत दोन्ही करून आयुष्य सार्थकी लावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

          तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शरद बोरीकर यांनी तर संचालन सरोज चांदेकर यांनी केले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक कलाकृती बघितल्या व त्यांच्याशी संवाद साधला.

          ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ : भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला होता. त्यानंतर श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ हा नारा दिला. तर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ हा नारा दिला आहे.

          भारत कोव्हीड व्हॅक्सीन निर्यातदार देश :

कोरोनाच्या काळात भारतामध्ये संशोधन करण्यात आलेली व्हॅक्सिन जगातील जवळपास 50 देशांनी वापरली. तर व्हॅक्सिन प्रमाणपत्र देण्याचे भारताचे सॉफ्टवेअर ब्रिटनने वापरले. या काळात भारत हा इतर देशांसाठी व्हॅक्सिन निर्यातदार देश म्हणून जगात नावारुपास आला.

          मुल्यमापन हे धनावर नाही तर गुणांवर :

घरांच्या नावफलकांवर संबंधित व्यक्तिची संपत्ती, धन दौलत, जमीन या बाबींचा उल्लेख आढळत नाही तर त्या व्यक्तिच्या पदव्या लिहिलेल्या असतात. मुल्यमापन हे कधीच धनावर होत नाही तर गुणांवरच होत असते. मुलांची मेरीटची गुणवत्ता हीच आई-वडीलांसाठी सर्वात मोठी भेट आहे.

          जिल्ह्यात सायन्स पार्कचे नियोजन :

विद्यार्थ्यांना संशोधकांची नावे माहित होण्यासाठी व त्यांचा आदर्श घेण्यासाठी सायन्स पार्क असणे आवश्यक आहे. या सायन्स पार्कच्या माध्यमातून विविध विषयांची माहिती, वेगवेगळ्या विषयात करण्यात आलेले संशोधन, त्याचा उपयोग आदींची माहिती मिळण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button